बीड : जिल्ह्यातील शिरूर येथे गुरूवारी मध्यरात्री 12 वाजता 10 ते 12 दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. काल रात्री बीड जिल्ह्यात तणाव असतानाच आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिरुर शहरातील जिजामाता चौक इथं असलेल्या 10 ते 12 दुकानांचे आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
शिरुरमध्ये जी दुकाने जळाली आहेत ती शॉर्टसर्किटमुळे जळाली असल्याची माहिती मिळाली आहे. सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओ फिरत असल्याने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिरुरमध्ये काल रात्री दहा दुकानांना आग लागली यामध्ये कोट्यावधी रुपयांच्या नुकसान झालं होतं. मात्र हे नुकसान शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या घटनेतून झालं असल्याचं दुकानदारांचे म्हणणं आहे. शिरुर कासारमधील मुख्य बाजारपेठेत जिजामाता चौकात असलेल्या या दुकानांना रात्री बारा वाजता अचानक आग लागली होती. या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे.
दरम्यान, या दुकांनांना आग का लावली हे अद्याप समजलं नव्हते. सुरुवातीला कोणी अज्ञातांनी दुकानाला आग लागव्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे. दरम्यान, सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण प्रचंड तापले आहे. बीड जिल्ह्यातही वातावरण गरम असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच काल मनोज जरांगे पाटील यांच्या मूळगावी दगडफेकीची घटना घडली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा काल बीडमध्ये आली होती. रात्री गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा नियोजित दौरा हा भगवानगड येथे जाऊन भगवान बाबाचे दर्शन करण्याचा नियोजित कार्यक्रम होता. मात्र, त्यापूर्वीच सायंकाळी म्हणून जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातेरीमध्ये एका डीजेवर दगडफेक झाली आणि त्यानंतर तणाव निर्माण झाला. यावेळी रस्त्यावरील काही गाड्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर मातोरी शहरांमध्ये पोलीस दाखल झाले. या पार्श्वभूमीवर गावात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लक्ष्मण हाके यांच्याकडून शांततेचे आवाहन करण्यात आलं आहे. आगीची घटना घडलेलं शिरुर हे गाव मातोरीपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे.

0 Comments